Monday, July 27, 2020

पाण्याच्या वापराबाबत कंजूषपणाच हवा

  माझ्या पाहण्यातील एक गाव. एकेकाळी पिण्याच्या पाण्याचे देखील वांदे होते. दोन वर्षांपूर्वी कृष्णा नदीच्या पाण्यावर चालणारी सिंचन योजना कार्यान्वित झाली आणि परिसरात पाणी आले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. पडीक जमिनी लागवडीखाली यायला लागल्या. गावाच्या भाळी असलेला दुष्काळ कायमचा मिटला. पाण्यासाठी या गावाने खूप सोसले होते. पाणी घेऊन येणाऱ्या टँकरची तासंतास वाट पाहिलेल्या लोकांचे हे गाव. रात्री-अपरात्री कधीही टँकर आला तर लोकांची पाणी घेण्यासाठी झुंबड उडायची. टँकरच्या पाण्यासाठी भांडणे व्हायची. पण या दोन-तीन वर्षात गावाचे सगळे रूपच बदलून गेले. गावाच्या चारी बाजूला हिरवळ नांदू लागली. पण याबरोबरच पाण्याची उधळपट्टी ही वाढू लागली. आधी पुरवून पुरवून पाणी वापरणारे लोक आता वारेमाप पाणी उधळताना दिसू लागले. गावातील एका व्यक्तीला सहज म्हणालो, "लोक पाणी असे वाया घालवतात ते योग्य नाही." तर तो म्हणाला, "जाऊ दे ना वाया. भरपूर पाणी आहे. थोडे वाया गेले तर काय बिघडते?"
   दुष्काळातून नुकत्याच सु काळात आलेल्या गावाची ही अवस्था तर ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच भरपूर पाणी आहे, जे नदीकाठाला राहतात, त्या लोकांची मानसिकता काय असेल याचा विचार न केलेलाच बरा.
   खरे तर पाणी ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. पाण्याचा कितीही सुकाळ आला तरी पाण्याचा वापर काटकसरीनेच करायला हवा, हे आमच्या लोकांना कोणीतरी सांगायला हवे. आपल्या भागात पावसाचे प्रमाण मुळातच कमी आहे, हे जणू काही लोक विसरूनच गेले आहेत. आता जरी आपल्याकडे पाणी आले असले तरी ते पाणी येण्यासाठी हजारो युनिट्स वीज खर्च करावी लागली आहे. (आणि अजूनही वीज खर्च केल्याशिवाय पाणी आपल्याकडे येत नाही.) लाखो लिटर्स पेट्रोल-डिझेल खर्च करावे लागले आहे. हजारो झाडे तोडावी लागली आहेत. याचे भान लोकांनी ठेवायला हवे. आपण जरी नदीकाठाला राहत असाल तरी तुमच्या घरापर्यंत आणि शेतीपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी वीज खर्च करावी लागतेच. त्यामुळे आपण पाणी वाया घालवल्यास वीज आणि पाणी या दोन्हींचीही उधळपट्टी होते. म्हणून पाण्याची उपलब्धता कितीही वाढली, तरी पाण्याचा उपयोग काटकसरीने करायला हवा. नव्हे पाण्याच्या बाबतीत तर कंजूषपणाच करायला हवा. 

Thursday, July 23, 2020

सापाबद्दल तुम्ही ऐकलेल्या या गोष्टी खोट्या आहेत


   आपण नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्या देशातील कृषी संस्कृतीच्या दृष्टीने नागपंचमीचा सण महत्त्वाचा आहे. परंतु त्याच वेळी साप दिसला रे दिसला तो मारून टाकण्याची प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये दिसून येते. सापाबद्दल प्रचंड अज्ञान आणि अंधश्रद्धा दिसून येतात. अनेक गैरसमज दिसून येतात. या लेखामध्ये सापाबद्दलच्या या अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
१) सापाबद्दल संपूर्ण भारतात आढळणारा आणि चित्रपट सृष्टीने मोठ्या प्रमाणात खतपाणी घातलेला गैरसमज म्हणजे साप डूख धरतो. सिनेमामध्ये काहीही दाखवले तरी आपण मनाशी खूणगाठ बांधा की साप कधीही डूख धरत नाही. सापाची कोणतीही जात डूख धरत नाही. सापाचा मेंदू इतर प्राण्यांच्या मानाने अतिशय अविकसित असा मेंदू आहे. तो इतका अविकसित आहे की तो माणसाचा चेहरा लक्षातच ठेवू शकत नाही. तसेच सापाची दृष्टीही कमजोर असते. विशेषतः कातणीला आलेल्या सापाची दृष्टी तर खूपच कमजोर असते. त्यामुळे सापाला व्यक्तीचा चेहराही स्पष्टपणे दिसत नाही. या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्या लक्षात येईल की साप डूख धरू शकत नाही.
२) सापाबद्दल आढळणारा दुसरा गैरसमज म्हणजे साप दूध पितो. गारुडी लोक आणि चित्रपटांनी हा गैरसमज वाढीस लावला आहे. साप हा मांसाहारी प्राणी आहे. दूध हे सापाचे अन्न नाही. उलट दूध हे सापासाठी विष ठरू शकते. कारण दूध सापाला पचत नाही. त्यामुळे साप दूध पितो हा गैरसमज आहे हे लक्षात घ्या. काही गारुडी लोक सापाला खूप दिवस पाणी देत नाहीत. त्यामुळे तहानलेला साप समोर दूध ठेवल्यास पाणी समजून पितो. परंतु एरव्ही साप दूध पीत नाही.
३) साप अमर असतो असाही एक गैरसमज आहे. साप म्हातारा झाला की कात टाकतो आणि आणि तो पुन्हा तरुण होतो, त्यामुळे तो मरत नाही, असा एक गैरसमज आहे. परंतु तसे काही नाही. पृथ्वीवरील इतर सजीवांप्रमाणे सापही मर्त्य प्राणी आहे. सापांच्या वेगवेगळ्या जातींना वेगवेगळे आयुष्यमान आहे.
४) नागा जवळ नागमणी असतो असे काही चित्रपट, काही फेक व्हिडीओ आणि अनेक चर्चांमधून पाहायला आणि ऐकायला मिळते. परंतु नागमणी असणारा साप नसतोच. अनेक सर्प तज्ञांनी सापांवर लक्ष ठेवून, वेगवेगळ्या पद्धतीने सापांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे की कोणत्याही नागा जवळ नागमणी नसतो.
५) सापाच्या अंगावर केस असतात असे काहीजण सांगतात. हेही खोटी आहे. साप हा सस्तन प्राणी नाही. तो सरपटणारा प्राणी आहे. जगामध्ये केस असणारा साप कुठेही नाही. गारुडी लोक सापाच्या त्वचेमध्ये इतर प्राण्यांचे केस सुईने रोवतात आणि लोकांना केस असणारा साप आहे असे सांगतात.
६) साप धनाचे रक्षण करतो असे सांगितले जाते. यातही काही तथ्य नाही. पूर्वीच्या काळी लोक धनसंपत्ती घरांमध्ये, जुन्या वाड्यांमध्ये पुरून ठेवायचे. पुढे जुनी घरे किंवा वाडे यांची पडझड झाल्यानंतर तिथे उंदीर घुशी यांचे प्रमाण वाढते आणि त्यांना खाण्यासाठी तिथे सापही येतात. अशा घराच्या ठिकाणी नवीन बांधकाम वगैरे करताना साप आणि पुरून ठेवलेले धन एकत्र सापडू शकते. याचा अर्थ साप धनाचे रक्षण करत होता, असा नाही.
७) मेलेला साप रॉकेलने जिवंत होतो असे सांगितले जाते. हाही गैरसमज आहे. साप मारताना त्याचे डोके ठेचले जाते आणि असा साप मेला तरी त्याच्या बाकीच्या शरीरातील पेशी जिवंत असतात. त्या लगेच मरत नाहीत. त्यामुळे सापावर रॉकेल ओतल्यानंतर सापाचे शरीर हालचाल करते. यालाच लोक साप जिवंत झाला असे म्हणतात. परंतु मेलेला साप जिवंत होणे सर्वस्वी अशक्य आहे.
८) सापाचे दोन तुकडे केल्यास सापाचे मुंडके मारणाऱ्याचा माग काढत राहते आणि मारणाऱ्या व्यक्तीचा बदला घेते, असा एक गैरसमज आहे. अर्थातच हे चुकीचे आहे. साप मेल्यानंतर सर्व संपते. सापाचे आयुष्य संपून जाते. मुंडकेही निर्जीव होऊन जाते.
९) मंत्राने सापाचे विष उतरते, हा एक मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये रुजून बसलेला आहे. या गैरसमजामुळे काही लोक विषारी साप चावल्यानंतर वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी मंत्रतंत्र करत बसतात आणि हकनाक व्यक्तीचा जीव घालवून बसतात. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार मंत्राने विष उतरवणे हा गुन्हा आहे, हे इथे लक्षात घ्यावे.
१०) पूजेने साप प्रसन्न होतो असे लोक मानतात. हाही गैरसमज आहे. पूजेचा अर्थ समजण्याइतकी बुद्धी सापाला नाही. त्यामुळे तो प्रसन्न होण्याचा प्रश्नच नाही. काही लोक तर नागपंचमीच्या दिवशी सापाला नवस बोलतात. नवस वगैरे अंधश्रद्धा आहेत हे आपल्या संतांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. 

   सापाबद्दल आणखीही काही गैरसमज आणि अंधश्रद्धा देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत. सगळ्याच इथे सांगणे शक्य नाही. पण आपणाला जेवढे माहीत आहे तेवढे लोकांना सांगणे आणि त्यांचे गैरसमज दूर करणे आपले काम आहे. आपणही हा लेख शेअर करून हे काम करावे अशी अपेक्षा आहे.

Wednesday, July 8, 2020

संपूर्ण वाचा, भयानक आहे सगळं!


१. भालचंद्र गायकवाड हे रुग्ण ठाणे महापालिकेच्या नव्याने बांधलेल्या ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधून बेपत्ता झाल्याचे घोषित केले जाते.
२. गायकवाड यांचे वय ७१, पँरालेसिसचा पेशंट पळून कसा जाणार?
३. घरच्यांच्या ही गडबड आहे लक्षात येते. देवेंद्र फडणवीस यांना नातेवाईक भेटतात. फडणवीस याची जबाबदारी किरीट सोमैया यांना देतात. सोमैया २ दिवस सैरभैर पळून पोलीस ठाण्यात हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा दाखल करायला लावतात.
४. हॉस्पिटल प्रशासन जागे होते व सांगितले जाते की ३ तारखेलाच ते मृत झालेत आणि त्यांचा मृतदेह दुसऱ्या कोणाला तरी दिला गेला.
५. कोणाला दिला गेला याचा शोध होतो. तर सोनवणे कुटुंबियाना ते सोनवणे काका आहेत म्हणून मृतदेह दिला जातो. बॉडी बॅग्ज  पारदर्शक नसल्यामुळे सोनवणे काकांचा मृतदेह बघता येत नाही. आणि कारोना मुळे बॉडीला हात लावता येत नसल्यामुळे तसेच अंत्यसंस्कार केले जातात.
६. आता दुसऱ्या दिवशी सोनवणे फॅमिली घरी क्वारंटाईन केली जाते आणि अचानक खऱ्या सोनवणे काकांचा घरी फोन येतो, मला बरं वाटतंय उद्या डिस्चार्ज मिळतोय. घरचे शॉक होतात, काल आपण जाळले कोणाला?
७. इकडे तोपर्यंत सोमैया धडपडून शोध लावतात की जो मृतदेह जाळला गेला तो तर गायकवाड यांचा होता, ज्या गायकवाडांना हॉस्पिटल ने बेपत्ता घोषित केलं होत.
८. सोनवणे काका आज घरी जातात,
स्टोरी इथेच संपत नाही.
९. सोनवणे काका जे मृत म्हणून आधी घोषित झाले, त्यांची ट्रीटमेंट त्यांच्या बेडवर मोरे नावाने चालू होती, हे त्यांना डिस्चार्ज घेताना पेपर बघून समजले.
१०. आणि मोरे तर ५ दिवसांपूर्वी बरे होऊन घरी गेलेत.

भयानक आहे सगळे, घरी रहा, काळजी घ्या...


Saturday, July 4, 2020

गुरुपौर्णिमेच्या सदिच्छा


      आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूचे महात्म्य सांगणाऱ्या पोस्ट पाठवण्यापूर्वी जरा आठवूया शाळेत असताना आपल्या गुरूने दिलेली शिकवण.
१) कधीतरी गुरूने सांगितले होते कि आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आज आपण ती संपत्ती जपतोय का? योग्य आहार-विहाराबरोबर व्यायाम करतोय का?
२) कधीतरी एकदा गुरूने सांगितले होते निर्व्यसनी असण्याचे महत्त्व. सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा यांचे व्यसन असणे ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आपण आज व्यसनांपासून दूर आहोत का? गुरूने दिलेली निर्व्यसनी राहण्याची शिकवण आज आपण आचरणात आणतोय का?
३) कधीतरी गुरुजींनी सांगितले होते सत्य निष्ठेचे महत्व. आज आपण सत्याने वागतोय का? बोलताना जास्तीत जास्त खरे बोलण्याचा प्रयत्न करतोय का?
४) कधीतरी एकदा गुरूने सांगितले होते भ्रष्टाचार, अनाचार, काळा पैसा ही या देशाला लागलेली कीड आहे. आज आपण वैयक्तिक जीवनात भ्रष्टाचारापासून दूर आहोत का?  भ्रष्टाचार करण्याची संधी असतानाही भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय का?
५) गुरूने एकदा असे सांगितले असेल 'जनसेवा हीच ईश्वरसेवा.' आज आम्ही जनसेवेत ईश्वराला पाहतोय का?

वरील प्रश्नांची उत्तरे 'होय' असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने आज गुरुपौर्णिमा साजरी करत आहात. आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप सदिच्छा!
💐💐💐

शाकाहार योग्य की मांसाहार?

       
हा प्रश्न तसा खूप जुना आहे. काहीजण भूतदयेच्या अंगाने हा प्रश्न उपस्थित करतात तर काहीजण नैतिकतेच्या अंगाने. तर काहीजण धार्मिकतेच्या अंगाने याकडे बघतात. प्रत्येकाचा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. 
         विचारी किंवा विवेकी माणसाला धार्मिकतेच्या बाजूने विचारलेला प्रश्न अस्वस्थ करत नाही. कारण धार्मिक मते ही मुळातच बहुतांशी अविवेकी असतात. त्यामुळे विवेकी माणूस धार्मिकतेच्या अंगाने विचारलेल्या प्रश्नांना भिक घालत नाही. परंतु भूतदयेच्या किंवा नैतिकतेच्या अंगाने विचारलेले प्रश्न विवेकी माणसाला अस्वस्थ करतात, विचारांला प्रवृत्त करतात. त्यात बहुतांशी विवेकी लोक मांसाहार करणारे आहेत. (अविवेकी लोकांमध्ये सुद्धा मांसाहार करणाऱ्यांचेच प्रमाण जास्त आहे.) त्यामुळे आपल्याकडून अविवेकी कृत्य घडत असेल तर विवेकी लोक स्वतःला दोषी मानतात. यातूनच मनात वैचारिक द्वंद्वाला सुरुवात होते. 
        मी स्वतःला विवेकी मानत नाही. परंतु विवेकाच्या बाजूचा मानतो. मी स्वतःला विवेकाच्या वाटेवरचा वाटसरू मानतो. मी अजूनही पूर्णपणे विवेकी झालो नाही. मी तसा होईन की नाही माहित नाही. परंतु मी विवेकी होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे हे मात्र नक्की. त्यामुळेच मला या प्रश्नाने अस्वस्थ केले, विचार करायला भाग पाडले. हे विचार करणे ही सुद्धा एक प्रक्रिया होती. वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या वेळी हा प्रश्न मनात उभा राहिला. आणि वेगवेगळ्या प्रसंगी मी यावर विचार केला. कधी मटन आणायला गेलो असताना, कधी सिनेमा बघताना, कधी सोशल मिडीयावर व्हिडीओमध्ये वेगेवेगळ्या प्राण्यांना शिकारताना पाहताना, कधी वाचन करताना, तर कधी पाळलेल्या प्राण्यांना खाऊ-पिऊ घालताना, त्यांना गोंजारताना या प्रश्नावर विचार केला. कधी कधी फक्त निवांत असतानाही यावर विचार केला. या विचारमंथनातून जे निर्माण झाले ते शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.
          भूतदयेच्या दृष्टीने विचार केला तर प्रत्येक जीवाला स्वतःचा जीव प्यारा आहे. प्रत्येक प्राण्याला स्वतःचे जीवन जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे.  प्रत्येक सजीव जीवावरचे संकट दिसले की त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ही निसर्गाने प्रत्येक सजीवाला दिलेली उपजत प्रवृत्ती आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाचे मोल आहेच. पण निसर्गानेच यातल्या कित्येक जीवांचा हा जगण्याचा अधिकार सुद्धा मर्यादित केलेला आहे. निसर्गात असे कित्येक प्राणी आहेत की जे केवळ दुसऱ्या प्राण्यांना खाऊनच जिवंत राहू शकतात. त्यामुळे भक्षकाचे भक्ष्य असणाऱ्या प्राण्यांना कितीही स्वतःचे जीवन महत्वाचे वाटले तरी निसर्गाने त्याचा जगण्याचा अधिकारच मर्यादित केला आहे. त्यामुळे हे लक्षात घेतले पाहिजे की भूतदया हा निसर्गाचा विषय नाही. त्याच्या दृष्टीने भक्षक आणि भक्ष्य दोन्हींचे अस्तित्व टिकणे महत्वाचे आहे. भूतदया हा विषय मानवाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण मानवच विचार करू शकतो. त्यालाच अनुकंपा, दया वगैरेंचे महत्त्व वाटते. 
          मांसाहारी प्राण्यांचे एक ठीक आहे. पण माणसाने प्राण्यांना खावे का? माणसासारख्या विचारी प्राण्याने तरी इतर प्राण्यांचा जगण्याचा अधिकार का नाकारावा? मांसाहारी प्राणी निसर्गतःच मांसाहारी आहेत. माणूस तसा आहे का? या प्रश्नाचा जरा शोध घेतला तर समजते की माणूस सुद्धा निसर्गतः मिश्राहारी आहे. पृथ्वीतलावर जन्माला आल्यापासून माणूस मांसाहार करत आला आहे. काही कीटकांपासून मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत अनेक जीवांना माणूस हा माणूस नव्हता तेव्हापासून खात आला आहे. जंगलात वणव्यामध्ये होरपळून मरण पावलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ल्यानंर मानवाला भाजलेले मांस जास्त चवदार लागते याचा शोध लागला. आणि नंतर मानवाने मांस आणि इतर पदार्थ सुद्धा भाजून खायला सुरुवात केली असे आपण शाळेत सुद्धा वाचले आहे. याचा अर्थच असा की मानव हा सुरुवातीपासूनच मिश्राहारी प्राणी आहे. मानवाला जवळचे असलेले माकडासारखे इतर काही प्राणी सुद्धा मिश्राहारी आहेत. जगातील प्राचीन वाङ्मयात सुद्धा माणसाच्या मांसभक्षणाची कित्येक वर्णने आली आहेत. उत्खननातील काही पुरावे सुद्धा माणसाच्या मांसभक्षणाची साक्ष देतात. म्हणजे माणूस केवळ शाकाहारी कधीच नव्हता. 
         दुसरा मुद्दा असा आहे की ज्या प्राण्यांना माणूस खातो, त्या प्राण्यांना तो वाढवतोही. हेच प्राणी नैसर्गिक अवस्थेत जंगलात भटकत असते तर त्यांना इतके आयुष्य लाभले असते का? जंगलात फिरणारी शेळी पाच वर्षे जगू शकली असती का? आज मानवाच्या आश्रयाखाली सरासरी सात ते दहा वर्षे शेळीचे आयुष्यमान असू शकेल. जंगलात हत्ती, वाघ, सिंह हे मोठे प्राणी म्हातारे होऊन मेलेले दिसतील. पण हरीण किंवा इतर छोटे प्राणी म्हातारे होऊन मेल्याचे दिसत नाही. याचे कारण यातील बहुतांशी प्राणी म्हातारे होण्यापूर्वीच शिकार झालेले असतात. माणूस सध्या मांसाहारासाठी जोपासत असलेले प्राणी जंगलात जगले असते त्यापेक्षा जास्त काळ माणसाच्या आश्रयाने जगत आहेत. म्हणजे त्यांना खाणारा माणूस त्यांचे आयुष्य कमी करत नाही तर उलट त्यांचे आयुष्य वाढवत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जंगलात या प्राण्यांना सतत भीतीखाली जगावे लागले असते. हेच प्राणी मानवाच्या आश्रयाखाली जेवढे आयुष्य जगत आहेत ते निर्धास्तपणे जगत आहेत. हे केवळ माणूस त्यांना खात असल्यामुळेच शक्य झाले आहे असे मला वाटते. माणूस या प्राण्यांना खात नसता तर त्यांना जंगलातच राहावे लागले असते, भीतीच्या छायेखालीच जगावे लागले असते आणि खूप कमी वयात दुसऱ्या कुठल्यातरी प्राण्याच्या हल्ल्यात त्यांना ठार व्हावे लागले असते. कारण मानवाने पाळलेले हे प्राणी निसर्गातील अतिशय दुर्बल प्राणी आहेत. 
       इथे मला वाटते भूतदया आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी निकालात निघतात. माणूस हा मुळातच स्वतःचे जीवन अधिक रोचक, मोहक करणारा प्राणी आहे. पण या नादात त्याने निसर्गाचाच विध्वंस करू नये ही अपेक्षा रास्त आहे, यावर दुमत असू नये.