Monday, January 13, 2020

छळछावण्या आणि डिटेन्शन कॅम्प्स

२०१४ साली मी एक फेसबुक पोस्ट टाकली होती. ती खालील प्रमाणे होती.

*आपणाला व्हाट्सअप किंवा फेसबुक वर एखादा व्हिडिओ मिळायचा, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला खुलेआमपणे लोक चिरडून मारताहेत, जाळून मारत आहेत,  ठेचून मारत आहेत किंवा भोसकून मारताहेत. आणि ते पाहताना आपल्या तोंडातून शिवी बाहेर पडायची,  किती नालायक लोक आहेत, किती नीच लोक आहेत, वगैरे वगैरे... आणि हे सगळे विचार मनात येत असतानाच दुसरा विचार मनात यायचा, किती बरे आहे आपल्या देशात हे होत नाही. हे कुठेतरी लांब अफगाणिस्थान, सीरिया, इराक वगैरे देशांमध्ये होते. आपल्याकडे होत नाही, ही किती चांगली गोष्ट आहे. परंतु हे सगळे आपल्याकडे सुद्धा आता लवकरच होईल. आपल्याकडे सुद्धा खुलेआम रस्त्यावर लोकांचे खून केले जातील. झुंडीने लोक एखाद्या व्यक्तीला मारतील.*

 ही पोस्ट टाकल्यानंतर अनेक लोकांनी कमेंट केल्या होत्या की असे काही होणार नाही. हा फक्त कल्पनाविलास आहे, वगैरे वगैरे. परंतु गेल्या पाच वर्षात हे सगळे तंतोतंत खरे ठरले. अनेक ठिकाणी मॉब लिंचींगच्या घटना उघडकीस आल्या. आणि विशेष म्हणजे मॉब लिंचींग करणाऱ्यांना सरकारमधील लोक पाठिंबा देत होते. इतकेच नाही तर या कृत्याबद्दल त्यांचा सत्कारही करत होते. हे भाकीत खरे ठरले याचे कारण म्हणजे सत्तेतील लोकांचा DNA जगजाहीर आहे. धर्मांधांच्या डीएनएमध्ये हिंसा by default असते, हा इतिहास आहे. याच आधारावर दुसऱ्या एका पोस्टमध्ये पुढचे भाकितही वर्तवले होते. लवकरच गॅस चेंबर आणि छळ छावण्यांची उभारणी केली जाईल. हिटलरने ज्यू लोकांची गॅस चेंबरमध्ये आणि छळ छावण्यांमध्ये कत्तल केली होती. अगदी तसेच भारतातही होईल, असे त्या पोस्टमध्ये मी म्हटले होते. मित्रहो, लवकरच हे आता होऊ घातले आहे. सरकारला विरोध करणारे लोक आणि शत्रू ठरवलेले इतर धर्मांचे लोक यांना डीटेन्शन कॅम्पमध्ये डांबून इतिहासाची पुनरावृत्ती केली जाणार आहे. भारताचा जर्मनी होणार आहे. आत्ताच सावध व्हा. नाहीतर पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. इतिहासातून काहीतरी शिका. खूप मोठ्या कष्टाने, अनेक लोकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेले आहे. त्याची कदर करायला शिका. स्वतःलाच गुलामीचे दूत होऊ देऊ नका.