सोमवार, ३ मार्च, २०२५

बलिदान मास नावाचे नवीन थोतांड



बहुजन लोकांना कर्मकांडात अडकवण्याची वैदिकांची खुमखुमी कधीच जाणार नाही. बहुजन जेवढे कर्मकांडात अडकतील तेवढे आपले वर्चस्व अबाधित राहील याची वैदीकांना खात्री आहे. म्हणूनच सातत्याने ते नवनवीन कर्मकांडे निर्माण करीत आलेले आहेत अगदी ३०-४० वर्षांपूर्वी बहुजनांच्या घरात महालक्ष्मी व्रत, वैभव लक्ष्मी व्रत होत नव्हते. पण बहुजन लेकी शिकायला लागल्या. विचार करायला लागल्या. मग  त्यांना कर्मकांडात अडकवण्यासाठी या व्रतांची निर्मिती करण्यात आली. दोनशे वर्षांपूर्वी कुठल्याही गावात सत्यनारायण घातला जात नव्हता. तोही आमच्या माथी थोपला. हिंदू धर्मात घुसखोरी करून आपले वर्णवर्चस्ववादी अजेंडे वैदिकांनी नेहमीच राबवले आहेत. 

   अलीकडच्या काळात बलिदान मास नावाचे एक थोतांड एका संघटनेकडून महाराष्ट्रात माजवले जात आहे. औरंगजेबाच्या आदेशाने संभाजी राजांची हत्या केली गेली म्हणून हा बलिदान मास पाळला जाऊ लागला आहे. वरवर पाहता यात आक्षेपार्ह काही वाटणार नाही. पण हे बहुजनांच्या मुलांच्या डोक्यात मुस्लिमद्वेष भरवण्याचे कारस्थान आहे. इतिहासातली मढी उकरून आत्ताच्या मुस्लिमांना लक्ष्य करण्याचे हे षडयंत्र आहे. 

    खरे तर इतिहासामध्ये या देशासाठी केवळ संभाजीराजांचा बली गेला आहे असे नव्हे. अगदी समाजजागृती करणाऱ्या संतांचाही खूनच झालेला आहे. इतर संतांचे मृत्यू संशयस्पद आहेत; पण तुकाराम महाराज यांचा खून ठळकपणे दिसून येतो. शिवाजी महाराज यांचा मृत्यूही नैसर्गिक नाही. त्यांनाही या मातीसाठी बलिदानच द्यावे लागले आहे. शहीद भगतसिंग यांनी या मातीसाठीच बलिदान दिले ना? महात्मा गांधींचे बलिदान या देशासाठीच होते. अशा शेकडो लोकांचे बलिदान या देशासाठी झालेले आहे. कुणा-कुणाकुणाचा बलिदान मास पाळणार? ते या महामानावांचा बलिदान मास पाळणार नाहीत.  कारण या बलिदानामध्ये त्यांच्याच पूर्वजांचे हात रक्ताने रंगलेले आहेत. स्वातंत्र्यलढ्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या विरोधात फितुरी करणारे त्यांचेच पूर्वज होते. स्वराज्याच्या विरोधात फितुरी करणारे त्यांचेच पूर्वज होते. आणि आता केवळ मुस्लिमद्वेष वाढवण्यासाठी त्यांना संभाजी राजांचा पुळका येतोय. जेम्स लेनने राजमाता जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे  तेव्हा त्यांना पुळका आला नाही. राज्यपाल भगतसिंग कोशियारी याने शिवरायांचा अपमान केला. अहमदनगर मधील भाजपचा नगरसेवक छिंदम यांने शिवरायांचा अपमान केला. भाजपचा पदाधिकारी सुधांशू द्विवेदी याने शिवरायांचा अपमान केला. राहुल सोलापूरकर याने शिवरायांचा अपमान केला. प्रशांत कोरटकर यांने शिवरायांचा अपमान केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्यामुळे तो पुतळा वाऱ्याने पडला. या सगळ्या वेळी या संघटनेचा पुढारी तोंडात मूग गिळून गप्प बसला. तो बलिदान मासाचे नाटक करत आहे. पदोपदी शिवराय, जिजाऊ, छत्रपती संभाजी यांचा अपमान होत असताना तो गप्प बसतो आणि त्यांच्या बलिदानाचे भांडवल करून मुस्लिमद्वेष वाढवतो, हे षडयंत्र ओळखायला हवे. 

    बलिदान मास कसा पाळला जातो? संघटनेने दिलेली स्तोत्रे गायची, ज्या स्तोत्रांमध्ये मुस्लिमद्वेष ठासून भरलेला आहे. पायात चप्पल घालायची नाही. केस कापायचे नाहीत. नखे कापायची नाहीत. असला सगळा मूर्खपणा आहे. बलिदान मास पाळण्यासाठी दररोज चार-तास अभ्यास करण्याचे कर्मकांड का सांगितले नाही? बलिदान मास पाळण्यासाठी दररोज सकाळी अर्धा तास व्यायाम करण्याचे कर्मकांड का सांगितले नाही? बलिदान मासात दररोज ग्रामस्वच्छता का केली जात नाही? असे उपक्रम घेतले जात नाहीत? कारण त्यांना विधायक काही करायचेच नाही. त्यांना केवळ लोकांना अंधश्रद्ध बनवणारे, लोकांना धर्मांध बनवणारे उपक्रमच हवे आहेत. समाजात इतके प्रश्न आहेत त्यावर हे कोणताही उपक्रम राबवणार नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यासाठी या संघटने कधीही आंदोलन उभारले नाही. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरवले. शेतकऱ्यांच्या शेतीचे रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांना आज्ञा दिल्या. शेतकऱ्यांना कर्जे पुरवली. शेतीची मोजणी करून नवीन शेतसारा पद्धत सुरू केली. पण उठता-बसता शिवरायांचे नाव घेणारे हे लोक शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाहीत. बलिदान मासाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून एखादा दिवस धरणे आंदोलन करायला काय हरकत आहे? पण हे ते करणार नाहीत. त्यांना शेतकरी सुखी झालेला नव्हे गुलाम झालेला पाहायचा आहे. म्हणूनच आपल्या मुलांना त्यांच्या बलिदान मासापासून आणि इतर उपक्रमांपासून दूर ठेवायला हवे.

बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

EVM मध्ये घोळ असल्याचे मारकडवाडी घटनेतून सिद्ध झाले






 मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलट पेपरवर अभिरुप मतदान घेणार असल्याचे जाहीर करताच निवडणूक आयोगाची पाचावर धारण बसली. EVM मशिनद्वारे घेतलेल्या मतदानात झालेला घोटाळा उघड होऊ नये म्हणून प्रशासनाने गावकऱ्यांवर पोलीस बाळाचा वापर सुरू केला. 3 डिसेंबरला गावात शेकडो पोलीस तैनात केले. गावात जमावबंदी आदेश लागू केला. हा आदेश मोडला तर लोकांना अटक करण्याच्या धमक्या दिल्या. आणि शेवटी हे मॉक पोल उधळून लावले. 

या घटनेतून काही प्रश्न उभे राहतात. हे मॉक पोलच तर होते. यातून प्रशासनाला, सरकारला काय धोका होता? हे गाव पातळीवरचे मतदान सरकार बदलणार नव्हते, आमदार बदलणार नव्हते, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होणार नव्हता. कारण ज्यावेळी खरे मदतदान झाले होते तेव्हा तिथे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नव्हता. मग खोट्या मतदानाच्या वेळी तो निर्माण होण्याचे काहीच कारण नव्हते. या मॉक पोल मधून कोणताही प्रश्न निर्माण होणार नसताना प्रशासनाला याची भीती का वाटली? याचे साधे सरळ कारण आहे, यातून निवडणूक आयोगाचे आणि EVM चे पितळ उघडे पडणार होते. EVM मधून मतांची पळवापळवी झाल्याचे उघड होणार होते. त्यामुळे प्रशासनाने हे मतदानच होऊ दिले नाही. याचा थेट अर्थ असा होतो की निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत EVM द्वारे गडबडी करून भाजपला सत्ता मिळवून दिली आहे. लोकशाही धोक्यात आहे ती याच कारणाने. लोकांची मते चोरण्याचा हा प्रकार लोकशाही मोडीत काढणारा आहे. आता ही लढाई लोकांनाच लढायला हवी. हिटलरी विचारधारा EVMमशिमध्ये घोळ करून भारतीय जनतेच्या डोक्यावर बसलेली आहे. तिला उखडून फेकण्यासाठी भारतीय जनतेला आता दुसरा स्वातंत्र्यलढा लढावा लागणार आहे, हे नक्की.



शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

'शिवाजी कोण होता?' पुस्तकात शिवरायांचा उपमर्द नाही

   


कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने शिवाजी महाराजांबद्दलचे अनेक गैरसमज दूर केले. तसेच सर्वसामान्यांना उपलब्ध नसलेली काही नवीन माहिती उपलब्ध करून दिली. या पुस्तकामुळे शिवाजी महाराजांच्या नावाचा हिंदुत्ववादी राजकारणासाठी उपयोग करणाऱ्यांची मोठीच गोची झाली. शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते, ते हिंदू धर्मरक्षणासाठी लढत होते, ते गो-ब्राह्मण प्रतिपालक होते, असे अनेक गैरसमज हिंदुत्ववाद्यांनी पसरवले होते. पण 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकामुळे त्यांची खूपच गोची झाली. सत्य इतिहास सांगणारे हे पुस्तक खूपच गाजले. त्याच्या आवृत्यांमागून आवृत्या निघाल्या. हिंदुत्ववाद्यांनी मग एक नवीनच पिल्लू सोडले. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे, अशी ओरड करायला त्यांनी सुरुवात केली. 'शिवराय' न म्हणता 'शिवाजी' म्हणणे म्हणजे जणू काही मोठे पापच आहे, अशा पद्धतीने प्रचार सुरू केला. विशेषतः शिवप्रतिष्ठानवाल्यांनी असा खूपच प्रचार केला. त्याला बरेच लोक बळी पडले. अगदी पुरोगामी चळवळीतील लोकही बळी पडले. अलीकडे शिवजयंतीच्या निमित्ताने 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाची पीडीएफ व्हाट्सअपवरून दरवर्षी व्हायरल होते. पण त्याचबरोबर शिवाजीचा एकेरी उल्लेख केला म्हणून ग्रुपमध्ये पीडीएफ टाकणाऱ्या व्यक्तीला दमबाजी केली जाते. काही ठिकाणी तर शिव्या दिल्या जातात. 'महाराजांचे नाव घेण्याची तुमची लायकी आहे का?' इथपासून आई-बहिणीपर्यंत शिव्या दिल्या जातात. खरेतर शिवाजी राजा हा इथल्या लोकांच्या हृदयामध्ये  आहे. प्रेमाने ते शिवबा म्हणतील, शिवाजी म्हणतील, शिवराय म्हणतील किंवा शिवाजी राजा म्हणतील. प्रत्येक शिवप्रेमीला कोणताही शब्द वापरण्याचे स्वातंत्र्य आहे. यातल्या कुठल्याही शब्दांमध्ये शिवाजी महाराजांचा उपमर्द नाही किंवा अपमान ही नाही. मुळात एकेरी उल्लेखामध्ये अपमान किंवा उपमर्द असतो हेच चुकीचे आहे. 

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आजच केला जातोय का? तर तसेही नाही. खूप जुन्या काळापासून तो केला जातोय. पुस्तकांमधून तर तो आहेच, पण लोकसाहित्यातही तो आहे. असे असताना आजच 'शिवाजी म्हणू नका शिवराय म्हणा' अशी दमबाजी कशासाठी? अशी दमबाजी करण्यात पुढे असणाऱ्या शिवप्रतिष्ठानवाल्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या ज्या पुस्तकाच्या एक लाख प्रती विकल्या होत्या त्या 'राजा शिवछत्रपती' पुस्तकातही शिवाजीचा एकेरी उल्लेख आढळतो. पण शिवप्रतिष्ठानवाल्यांनी तिथे कधी विरोध केला नाही. विरोध फक्त गोविंद पानसरे यांच्या पुस्तकालाच असतो. बाबासाहेब पुरंदरे यांनी एकेरी उल्लेख केला तर चालतो; परंतु गोविंद पानसरे यांनी एकेरी उल्लेख केलेला चालत नाही. कारण स्पष्ट आहे. 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लोकांनी वाचू नये यासाठीच असा दुष्प्रचार केला जातोय.

    खरेतर गोविंद पानसरे यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकातून शिवरायांचे चरित्र कितीतरी प्रभावीपणे लोकांच्या समोर मांडले आहे. शिवरायांबद्दल अतीव प्रेम वाटावे, इतकी चांगली मांडणी त्यांनी या पुस्तकात केली आहे. सहाजिकच शिवरायांचा उपमर्द किंवा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नाही हे स्पष्ट आहे. तेव्हा या पुस्तकाच्या नावाबद्दल कुणी आक्षेप घेतलाच तर त्यांना 'आधी पुस्तक वाचा', असे सांगा. तरीही त्यांचा कांगावा सुरूच राहिला; तर शिवराय आमचे आहेत. त्यांना आम्ही काय म्हणायचे आणि काय म्हणायचे नाही ते आम्ही ठरवणार. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? असे खडे बोल सुनवा.

मंगळवार, २३ जुलै, २०२४

एका माणसामुळे समूह पूर्ण व्हिलन ठरत नसतो

 'अ' या व्यक्तीने 'ब' या व्यक्तीचा खून केला. याचा बदला म्हणून 'क' या व्यक्तीचा खून करण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते? गुन्हेगार 'अ' आहे; पण शिक्षा केली जाते 'क' ला. या गोष्टीला तुम्ही न्याय्य समजाल का?

विचारी माणूस अर्थातच या गोष्टीचे कधी समर्थन करणार नाही. ही गोष्ट न्याय्य समजणार नाही. उलट ही गोष्ट म्हणजे माणुसकीच्या विरोधातली होईल. पण समाजात अलीकडच्या काळात असे होत आहे आणि याचे हिरीरीने समर्थनही केले जात आहे. ज्यावेळी 'अ' ने 'ब' ला मारले तेव्हा तुम्हाला कसे चालले? आता क ला मारले म्हणून का ओरडताय? असा सवालही विचारला जातोय. दूर परदेशात कुठेतरी मुस्लिम नेत्याला किंवा मुस्लिम अतिरेक्याला मारले जाते आणि त्याचा बदला म्हणून भारतात अतिरेकी हल्ले होतात. पाकिस्तानमध्ये हिंदूंच्यावर अत्याचार केले जातात म्हणून भारतातल्या मुस्लिमांच्यावर अत्याचार करून त्याचे समर्थन केले जाते. कधीकाळी काश्मीरमध्ये हिंदूंवर हल्ले केले गेले त्याचा बदला म्हणून महाराष्ट्रात मुस्लिमवर हल्ले करायचे आणि वर त्याचे समर्थनही करायचे. या गोष्टी माणुसकीला काळीमा फारसणाऱ्या आहेत. केवळ धर्माच्या आधारे माणसांचे वर्गीकरण करून पूर्ण समूहालाच व्हिलन ठरवणे अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण धर्मांधता सर्व धर्मांमध्ये आहे. सर्व धर्मांमध्ये अतिरेकी विचारांचे लोक आहेत. एखाद्या धर्मातील अतिरेकी विचाराच्या लोकांचा दाखला देऊन त्या धर्मातील सर्वच लोकांना अतिरेकी समजणे केवळ चुकीचेच नाही तर मूर्खपणाचे देखील आहे. आपण जितक्या लवकर या मूर्खपणातून बाहेर पडू तेवढे आपल्या फायद्याचेच आहे. कारण मूर्खपणाची सवय घातक आहे.